*सातोसे येथे ‘खेळ पैठणीचा-सन्मान नारी शक्तीचा ’ स्पर्धा उत्साहात; आर्वी धुरी विजेत्या*
*महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमाला रंगत;शामल नागवेकर व तनुजा गडेकर उपविजेत्या*
बांदा
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातोसे येथे महिला ग्रुप सातोसे व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेळ पैठणीचा – सन्मान नारी शक्तीचा’ या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, गावच्या सरपंच प्रतीक्षा मांजरेकर,उपसरपंच रुपेश साळगावकर, माजी सरपंच मदन सातोसकर,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंत धुरी, ग्रामपंचायत सदस्या शुभदा गवंडी, संपदा धुरी, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा पंडित आदी मान्यवर तसेच विविध बक्षीसांचे पुरस्कर्ते भरत पेडणेकर, चिरायू मांजरेकर व वीणा बर्डे उपस्थित होते.
महिलांच्या सन्मानासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावातील अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभाग नोंदवून कार्यक्रमाला रंगत आणली.
या स्पर्धेत आर्वी धुरी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या कौशल्यपूर्ण सादरीकरणामुळे त्यांनी विजेतेपद मिळवले. तर शामल नागवेकर आणि तनुजा गडेकर यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. विजेत्या आणि उपविजेत्या स्पर्धकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पैठणी साड्या देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जे. डी. पाटील यांनी अत्यंत प्रभावी आणि ओघवत्या शैलीत केले. त्यांच्या आकर्षक निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमात चांगली रंगत निर्माण झाली आणि उपस्थितांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि खेळाचा मनमुराद आनंद लुटला.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकारी शिक्षक आशिष तांदुळे तसेच सातोसे नं१शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सीमा पंडित यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांच्या कष्ट, जिद्द आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून अशा उपक्रमांमुळे त्यांना अधिक प्रेरणा मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रतिक्षा मांजरेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य व महिला मंडळ,बचतगट व ग्रामस्थ तसेच सूत्रसंचालन प्रसाद मांजरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
