You are currently viewing रसास्वाद गझलेचा

रसास्वाद गझलेचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ गझलकार जयराम धोंगडे यांनी गझलकार डॉ.शिवाजी काळे यांच्या गझलेचे केलेलं रसग्रहण*

 

*रसास्वाद गझलेचा* 

••••••••••••••••

 

*स्पर्श घेऊन गेलीस दुसऱ्याकडे*

*पण शहारा विसरलीस माझ्याकडे*

 

*व्याप असतो मला खूप माझाच पण*

*लक्ष असते तुझ्या बंद दाराकडे*

 

*आग लावू नका फक्त वणवा म्हणा*

*पेट घेतील काही खुळी लाकडे*

 

*वर्तमानात जर मी खटकलो तुला*

*माग स्पष्टीकरण भूतकाळाकडे*

 

*देव नसतो अशी बोंब ठोकायची*

*आणि त्यालाच घालायचे साकडे*

 

*या सुखांनो मला आत शोधा जरा*

*फक्त पाहू नका या ढिगार्‍याकडे*

 

*नग्न आत्मा कशाने लपवशिल शिवा*

*माप नसते कुणाचेच शिंप्याकडे*

 

*डॉ. शिवाजी काळे*

___________________________________

 

डॉ. शिवाजी काळे यांची ही गझल भावविश्वाच्या अनेक स्तरांना स्पर्श करणारी आहे. प्रेम, विरह, सामाजिक जाणीव, श्रद्धा-अश्रद्धेतील दुटप्पीपणा, आत्मशोध आणि अखेरीस आत्मस्वीकार— अशा विविध भावछटांचा प्रवास या गझलेत अनुभवायला मिळतो. प्रत्येक शेर स्वतंत्र आशय घेऊन उभा असला, तरी त्यांची अंतःसलगता वाचकाला एका अंतर्मुख प्रवासाकडे घेऊन जाते.

 

 

गझलेचा मतला —

*“स्पर्श घेऊन गेलीस दुसऱ्याकडे*

*पण शहारा विसरलीस माझ्याकडे”*

 

अत्यंत सूक्ष्म भावनेचा आहे. ‘स्पर्श’ आणि ‘शहारा’ या दोन प्रतिमांमध्ये बाह्य आणि अंतर्गत अनुभवांचा सुंदर भेद दिसतो. स्पर्श हा देहाचा, तर शहारा हा मनाचा. प्रिय व्यक्ती देहाने दूर गेली, तरी तिच्या स्पर्शाचा भावकंप अजूनही मनात शिल्लक आहे. हा शेर आक्रोश करत नाही; तो शांत वेदना व्यक्त करतो. यात मालकीभाव नाही, तर अनुभवाची अमिट छाप आहे. विरहाला डॉ.काळे यांनी अभिजाततेची किनार दिली आहे.

 

दुसरा शेर —

*“व्याप असतो मला खूप माझाच पण*

*लक्ष असते तुझ्या बंद दाराकडे”*

 

मानवी मनाच्या द्विधा अवस्थेचे चित्रण करतो. आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या, व्याप आणि धावपळ असली, तरी मन मात्र एका न उघडलेल्या दाराकडेच लागून राहते. ‘बंद दार’ ही प्रतिमा अत्यंत अर्थवाही आहे. ती नाकारलेले नाते, अपूर्ण स्वप्न किंवा न साकारलेली शक्यता दर्शवते. मनाची ही हट्टी आसक्ती मानवी स्वभावाचे वास्तव दर्शन घडवते. डॉ.शिवाजीराव येथे स्वतःच्या मनाची कबुली देतात.

 

तिसरा शेर —

*“आग लावू नका फक्त वणवा म्हणा*

*पेट घेतील काही खुळी लाकडे”*

 

सामाजिक भान जागृत करणारा आहे. शब्दांचे परिणाम किती दूरगामी असतात, याची जाणीव येथे आहे. ‘आग’ आणि ‘वणवा’ या प्रतिमा उग्रता, विध्वंस आणि अस्थिरतेचे प्रतीक आहेत. कवी सूचित करतो की उथळ, उत्तेजक किंवा बेफिकीर भाषणामुळे समाजातील अविवेकी घटक भडकू शकतात. हा शेर केवळ काव्यात्मक नाही, तर सामाजिक जबाबदारीची आठवण करून देणारा आहे.

 

*“वर्तमानात जर मी खटकलो तुला*

*माग स्पष्टीकरण भूतकाळाकडे”*

 

हा शेर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीचे वर्तमान तिच्या भूतकाळाच्या अनुभवांनी आकारलेले असते. त्यामुळे एखाद्याच्या आजच्या वर्तनावर टीका करण्याआधी त्याच्या इतिहासाची जाणीव असावी, असा सूचक संदेश येथे आहे. हा शेर समजुतीचा आग्रह धरतो. न्याय करण्यापेक्षा समजून घेण्याची वृत्ती अधिक मानवी आहे, हे गझलकार काळे यांनी नेमकेपणाने व्यक्त केले आहे.

 

*“देव नसतो अशी बोंब ठोकायची*

*आणि त्यालाच घालायचे साकडे”*

 

या शेरात उपरोध आणि वास्तवदर्शन आहे. वरकरणी नास्तिकतेचा आव आणणारी माणसे संकटकाळात मात्र देवाकडेच धाव घेतात. श्रद्धा आणि अडचणीतील आर्तता यांतील विरोधाभास कवीने प्रभावीपणे टिपला आहे. हा शेर केवळ धार्मिक संदर्भात नाही, तर मानवी स्वभावातील दुटप्पीपणावर भाष्य करतो. आपण ज्या गोष्टी नाकारतो, त्याच गोष्टींची गरज पडते, ही विसंगती येथे ठळक होते.

 

*“या सुखांनो मला आत शोधा जरा*

*फक्त पाहू नका या ढिगार्‍याकडे”*

 

हा शेर आत्मशोधाचा केंद्रबिंदू आहे. ‘ढिगारा’ म्हणजे बाह्य यश, संपत्ती, प्रतिष्ठा किंवा भौतिक वैभव. डॉ. शिवाजी भाऊ म्हणतात की खरे सुख बाह्य गोष्टींमध्ये नसून अंतरंगात आहे. हा विचार भारतीय तत्त्वपरंपरेतील आत्मानंदाच्या संकल्पनेशी सुसंगत वाटतो. उपनिषदांनी ज्या ‘आत्मविद्या’चा पुरस्कार केला, त्याचीच छटा येथे दिसते. कवी बाह्य आवरणापलीकडे जाऊन आत्मिक समाधानाचा शोध घेण्याचे आवाहन करतो.

 

अंतिम शेर —

 

*“नग्न आत्मा कशाने लपवशिल शिवा*

*माप नसते कुणाचेच शिंप्याकडे”*

 

गझलेचा उत्कर्षबिंदू आहे. ‘नग्न आत्मा’ ही प्रतिमा अत्यंत प्रभावी आहे. आत्मा उघडा असतो, त्याला बनावटपणाचा आडोसा नसतो. शिंप्याकडे कपड्याचे माप असते; पण आत्म्याचे मोजमाप नाही. त्यामुळे आत्म्याचे सत्य लपवणे अशक्य आहे. हा मक्त्याचा शेर, येथे ‘शिवा’ हा तख्खलूस म्हणून चपखलपणे वापरला आहे. हा आत्मसंवाद गझलेला वैयक्तिक आणि अंतर्मुख स्वर देतो. हा शेर आत्मस्वीकाराचा आणि प्रामाणिकतेचा संदेश देतो.

 

एकूण पाहता, या गझलेचा प्रवास अत्यंत सुबक आहे. पहिल्या शेरातील विरहाची कोमलता हळूहळू सामाजिक जाणीवेपर्यंत आणि तत्त्वचिंतनापर्यंत विस्तारते. भाषा साधी, नेमकी आणि प्रभावी आहे. प्रतिमा सहज आहेत, पण अर्थगर्भ आहेत. प्रत्येक शेरात वेगळा आयाम आहे— प्रेम, आसक्ती, सामाजिक जबाबदारी, सहानुभूती, उपरोध, आत्मशोध आणि आत्मस्वीकार.

 

ही गझल वाचकाला केवळ भावुक करत नाही; ती विचार करायला भाग पाडते. स्वतःकडे पाहण्याची, आपल्या विरोधाभासांना ओळखण्याची आणि अंतर्मनाशी प्रामाणिक राहण्याची प्रेरणा देते. त्यामुळे ही गझल भावनिक आणि तात्त्विक अशा दोन्ही स्तरांवर समृद्ध ठरते.

 

*जयराम धोंगडे*

प्रतिक्रिया व्यक्त करा