अमरावती दि. 22 – 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात देशात व जगात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने मिशन आयएएस अंतर्गत महिनाभर स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या उपक्रमा अंतर्गत मिशनचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे व त्यांचे सहकारी विविध महाविद्यालयांमध्ये शाळांमध्ये तसेच संस्थांमध्ये जाऊन विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम राबविणार आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रवास खर्च कुठल्याही प्रकारचे मानधन घेण्यात येणार नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभिनव उपक्रमाची सुरुवात दिनांक 27 जानेवारी 2026 पासून नंदुरबार या जिल्ह्यापासून होणार आहे. नंदुरबार येथील महात्मा फुले प्रतिष्ठानने या कामी पुढाकार घेतला असून संपूर्ण आठवडाभर जवळपास 25 कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री शांतीलाल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एका संयोजन समितीचे आयोजन करण्यात आली असून त्यामध्ये सर्वश्री मधुकर माळी रमेश महाजन जगन्नाथ माळी हिरालाल महाजन संजय देवरे सतीश भाऊराव पाटील नरेंद्र जाधव सुभाष माळी पितांबर खैरनार व राजेंद्र माळी यांचा समावेश आहे . या शिष्टमंडळाने नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ.मिताली शेठी यांची भेट घेऊन त्यांना या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले असून संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे कबूल केले आहे. या संदर्भातच नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त श्री प्रवीण गेडाम यांचे देखील सहकार्य घेण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा समारोप रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील खेड या गावाला होणार आहे. हे अभियान संपूर्ण महिनाभर चालणार असून महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावे यासाठी या विद्यार्थी जनजागरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी व संस्थांनी अधिक माहितीसाठी व आपल्या संस्थेत स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांना 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मिशन आयएएस ही भारतातील प्रतिष्ठित संस्था असून या संस्थेने आतापर्यंत संपूर्ण भारतात 17178 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतलेल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे. विशेष म्हणजे या संस्थेमार्फत दुसऱ्या वर्गापासून फक्त एक रुपयांमध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. शिवाय मुलांना विनामूल्य पुस्तके व सराव परीक्षा ह्या सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. या संस्थेच्या विविध उपक्रमात आतापर्यंत 273 आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व राजपत्रितअधिकारी सहभागी झाले असून संस्थेने स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात वेळोवेळी वेगवेगळी पुस्तके प्रकाशित केलेली आहेत .संस्थेने आयोजित केलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल जनमानसांमध्ये समाधान दिसत असून अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
अमरावती
9890967003
