*ज्येष्ठ कवी श्री मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”हिशोब”*
पाप आणि पुण्याचा
हिशोब आहे द्यायचा
जैसे कर्म,तैसे फल हा
न्याय असे भगवंताचा. /१/
जन्मासंगे सुरु होई हा
वजा बाकी चा खेळ
उत्तर देण्या” चित्रगुप्तासी”
नाही क्षणाचा वेळ. /२/
चारित्र्यावर चरित्र घडते
कलंक किंवा सत्कीर्ती
विनाश काले, विपरीत बुद्धी
सुचता होई “अपकिर्ती”/३/
मनुष्य जीवन,असे आरसा
काचे सम “चारित्र्य” असे
कलंकाचे घाव त्यावरी
भग्न अवशेषी,काच जसे/४/
सकस ओल्या माती पोटी
वृक्ष अनेक जन्मती
अमृत वृक्षा स्विकारुनी,जन ते
विष वृक्षा छेदीती. /५/
नितळ निळ्याशा कूपामधले
उदक प्राशण्या योग्य असे
मलिनतेच्या भाळी केवळ
अस्विकृती चा शाप असे. /६/
फसवे क्षण हे,आयुष्याचे
मोह मायेचे भांडार
सदसद्विवेकबुद्धी नसता
दिव्या खालती अंधार. /७/
कर्म चाले संगती हा
सिद्धांत आहे नियतीचा
पाप आणि पुण्याचा
हिशोब आहे द्यायचा. /८/
रचना:— मोहन मराठे…..
