*महाविकास आघाडीच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव’ धरणे आंदोलन*
*मविआचे पदाधिकारी, कार्यकर्ते,फळ बागायतदार शेतकरी व शेतकरी संघटना यांनी आंदोलनात सहभागी व्हावे- सतीश सावंत*
सिंधुदुर्गनगरी
वारंवार मागणी करूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळ-पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नसल्याने महायुती सरकार आणि भारतीय कृषी विमा कंपनीचे कान उघडण्यासाठी उद्या गुरुवार दि. ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे “ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव” धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
फळ-पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम न दिल्याने भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकणार असल्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषि अधीक्षक यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले नाही. गणेश चतुर्थी अगोदर फळ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र विमा कंपनीने विम्याची रक्कम सोडाच विम्याचा डाटा देखील प्रसिद्ध केला नाही. जिल्हाधिकारी, कृषी अधिक्षक यांना आम्ही वारंवार निवदने देऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महायुती सरकार, राज्याचे कृषिमंत्री आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या विरोधात हे आंदोलन छेडले जाणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व फळ बागायतदार शेतकरी आणि फळबागायतदार शेतकरी संघटना यांनी पक्ष भेद विसरून उद्याच्या या आंदोलनामध्ये सामील व्हावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी केले आहे.

