*के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवलीचे प्रा.प्रशांत शिरुडे लिखित अप्रतिम लेख*
*इतिहास अभिजात माय मराठीचा*
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
कवी माधव ज्युलियन सह अनेक साहित्यिकांचा विश्वास सार्थ करत 3 ऑक्टोबर 2024 रोजी अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा होत आहे. 3 ऑक्टोंबर पासून राज्यभर विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय, मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या असंख्य संस्था व नागरिक हा उत्सव साजरा करीत आहेत. मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रयत्न सर्व स्तरावरून होत आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणून नुकताच केवळ महाराष्ट्रात, देशात नाही तर जगात पहिल्या क्रमांकाची शाळा म्हणून येण्याचा बहुमान पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदर नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने मिळवला आहे. वाबळेवाडीची शाळा जगाच्या नकाशावर घेऊन जाणाऱ्या दत्तात्रय वारे गुरुजी यांनी हे शक्य करून दाखवले आहे. त्यांच्या कार्याला मनापासून सलाम व त्रिवार अभिनंदन. मराठी शाळांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद व गौरवास्पद गोष्ट.
या आनंदाच्या क्षणी आपल्यासमोर कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा सन्मान कसा प्राप्त होतो? अभिजात भाषा म्हणजे काय? हे सांगत मराठी भाषेचा व महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न.
साहित्य अकादमीने एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्यासंबंधी खालील प्रमाणे निकष निश्चित केले आहेत. अभिजीत भाषा 1500 ते 2000 वर्षाहून अधिक जुनी असावी आणि तेवढेच मौल्यवान प्राचीन वाङ्मय त्या भाषेत असावे. त्या भाषेची स्वतःची परंपरा असावी आणि त्यासाठी अन्य भाषांवर अवलंबून नसावे. भाषेचे आधुनिक रूप हे तिच्या प्राचीन रूपाहून भिन्न असले तरी चालेल पण त्यांच्यात आंतरिक नाते असावे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. हा सर्व खटाटोप करण्यामागे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दरवर्षी केंद्राकडून मराठीच्या विकासासाठी व संशोधनासाठी 500 कोटी रुपये मिळतील हा एक स्पष्ट दिसणारा फायदा होता. परंतु आपल्या मराठी भाषेविषयी आपल्यालाच खरेखुरे प्रेम हवे, अभिमानही हवा पण तो दुर्दैवाने तसा दिसत नाही हेही सत्य नाकारून चालणार नाही…….
संयुक्त महाराष्ट्राच्या देदीप्यमान चळवळींच्या माध्यमातून शेवटी त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजींसह यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश 1 मे 1960 या शुभ दिनी घेऊन आले आणि पहाटे संयुक्त महाराष्ट्राच्या नवीन राज्याचे उद्घाटन झाले. लोकनेता, समतोल राजकारणी, व्यवहार चातुर्य, कुशल प्रशासक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्र घडविला. हा सामर्थ्यवान महाराष्ट्र मग म्हणू लागला.
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले|
मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले||
खरा वीर वैरी पराधीनतेचा|
महाराष्ट्र आधार या भारताचा||
अशा या कणखर, राकट, तरीही नाजूक, कोमल, फुलांच्या देशाला शौर्याच्या, धैर्याच्या देशाला आमचा कोटी कोटी प्रणाम.
भाषा बोलणार्यांच्या प्रमाणाचा विचार केला तर मराठी भारतात क्रमांक ३ वर व जगात क्रमांक १० वर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीत ५४ बोलीभाषा आहेत. घटनेनुसार १९६५ पासून महाराष्ट्र राज्याची देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा आपण राजभाषा म्हणून स्वीकार केला आहे. आता तिला अभिजात भाषेचाही दर्जा मिळाला आहे.
अभिजात भाषा म्हणजे *’वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारकडून दिला जाणारा दर्जा’* जो काल पर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया यांना मिळाला होता. तो आज मराठी सोबत पाली, प्राकृत, बंगाली, असामी याही भाषांना मिळाला. पण मराठीच्या व महाराष्ट्राच्या उगमाचा विचार करता रामायण महाभारता पासून अनेक संदर्भ सापडतात .
रामायणात प्रभू रामचंद्र व सीता माई सध्याच्या नाशिक येथील पंचवटीत राहत होते तर महाभारतातील भगवान श्री कृष्णाची पत्नी रुक्मिणी कौडिन्यपूर राजाची राजकन्या होती. कौडिन्यपूर आताच्या नागपूर जवळ आहे.
पण इतिहास दृष्टिकोनातून विचार करता इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात गौतम बुद्धांचा शिष्य मोगलीपुत्त दिस्स याने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी मराठी प्रदेशात शिष्य पाठविल्याचा संदर्भ सापडतो. त्यानंतरच्या काळात हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग असल्याचा संदर्भ इतिहासात सापडतो. सम्राट अशोकाच्या काळात महाराष्ट्रातील सोपारा आताचे नालासोपारा या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचीन असा व्यापार चालू असे.
इ.स. पूर्व चे २ रे शतक ते इ स चे २ रे शतक या कालखंडात येथे सातवाहन राजे राज्य करीत होते .हा कालखंड म्हणजे समृद्धीचा, विदेशी व्यापाराचा कालखंड . या कालखंडात दोन समृद्ध ग्रंथ लिहिले गेले ते प्राचीन मराठी प्राकृत भाषेत लिहिले, पहिला ग्रंथ गुनाढ्याचा कथासरित्सागर किंवा बृहत कथासरित्सागर, त्यात वर्णन असलेला मराठी समाज वैभवसंपन्न आहे . दुसरा ग्रंथ सातवाहन राजा हाल ने रचलेली गाथासप्तशती .
या कालखंडात भाषेचे वहन झाले ते शौरसेनी पैशाची चे पुढे मराठी कडे मार्गक्रमण झाले सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी ने इ.स. ७८ मध्ये शालिवाहन शक सुरू केले. सातवाहन राजांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पराक्रमी व प्रगतीशील होते.
सातवाहनांनंतर महाराष्ट्रात वाकाटकांचे साम्राज्य होते, त्यांची राजधानी विदर्भातील वत्स्यगुल्म म्हणजे आताचे वाशिम .वाकाटक व गुप्तांचा कालखंड एकच इ.स. ४ थे, ५ वे, ६ वे शतक,.
वाकाटकांनंतर या प्रदेशावर चालुक्यांचे राज्य होते. ७ व्या शतकात भारतात आलेल्या चिनी प्रवासी युवानश्वांग ने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याची गोदावरीच्या काठी असलेल्या त्याच्या प्रतिष्ठान म्हणजे आताचे पैठण नामक राजधानीत भेट घेतल्याचा संदर्भ त्याच्या प्रवासवर्णनात लिहून ठेवला आहे. त्यात तो मराठी माणसाचे वर्णन करताना सांगतो मराठी वृत्तीने प्रामाणिक आहेत, मित्रासाठी जीव देणारे आहेत, शत्रुत्व झाले तर जीव घेणारेही आहेत. वाकाटक, चालुक्य, व राष्ट्रकुट राजांच्या काळात अजिंठा-वेरूळची लेणी तयार झाली.
दक्षिणेत रठीक नावाचा जनसमूह होता या रठीक चे संस्कृतीकरण झाल्यावर राष्ट्रीक असा शब्द तयार झाला त्यातूनच पुढे महाराष्ट्र हा शब्द तयार झाला असे मत अनेक इतिहास लेखकांचे आहे .
अशा या महाराष्ट्रातील मराठीची पहिली अद्याक्षरे सापडतात ती कर्नाटकातील म्हैसूर जवळील श्रवण बेळगोळा येथील वर्धमान महावीरांच्या भव्य पुतळ्याखाली मराठी ची अद्याक्षरे कोरलेली आहेत.
‘श्री चामुंडराये करवियले
गंगाजे सुत्ताले करवियले’
ही मराठीची अद्याक्षरे असून त्या पुतळ्याचे नाव भद्रबाहू आहे. या शिलालेखावर इ.स. ९ वे शतक असे कोरले आहे.
मराठीचा जन्म प्राकृतोद्भव की संस्कृतोद्भव पण ह्या प्रश्नाचे उत्तर शोधताना बहुसंख्य भाषाशास्त्री मान्य करतात की मराठी संस्कृतोद्भव आहे. तिच्यावर प्राकृताचे सुद्धा सखोल संस्कार आहेत. शब्द संख्येचा विचार केला तर मराठीत ९५ टक्के शब्द संस्कृत पासून आले आहेत.
अनेक इतिहास संशोधकांच्या मते मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेकसिंधु असून तो मुकुंदराज यांनी लिहिला. ते मराठवाड्यातील अंबेजोगाई येथील आहेत. हा ग्रंथ १२ व्या शतकात लिहिला गेला.
त्यानंतर सुमारे ७५ ते १०० वर्षांनी महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींनी लीळाचरित्र ग्रंथ लिहिला.
त्यानंतर मराठी भाषेचा विकास वेगाने झाला. यादव काळात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. यादवांचे राज्य अनेक अर्थाने शांततेचे, संपन्नतेचे व विकासाचे राज्य होते .या कालखंडात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली व त्यातून अवघे विश्वचि माझे घर हे सांगताना आपली जागतिकीकरणाची दृष्टी स्पष्ट केली. शंकराचार्य मूळचे केरळातील पेरिया उर्फ पूर्णा नदीच्या काठावरील केरली गावचे. त्यांनी मांडलेला विचार निवृत्तीनाथांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांना मिळाला. ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांसाठी भक्तीचा मार्ग सांगितला व वारकरी संप्रदायाची स्थापना केली. पुढे हा विचार नामदेवांनी उत्तरेत नेला. महाराष्ट्रात संत तुकारामांनी याच विचाराचा विकास केला म्हणूनच म्हणतात
‘ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस’
मराठीची गौरव पताका ज्या जोडगोळीमुळे अभिमानाने डोलते ती हीच ज्ञानबातुकोबाची जोडी .
इ.स.१३१० पर्यंत महाराष्ट्रात यादवांचे राज्य होते. यादवांनी ठिकठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अशी हेमाडपंथी मंदिरे बांधली, याच काळात भास्कराचार्यांनी लीलावती हा गणितावर संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला.
१३२५ ते १५६५ दक्षिण भारतात विजयनगरचे साम्राज्य होते. पण १३ व्या शतका पासून महाराष्ट्रावर इस्लामी आक्रमणे सुरू झाली. अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुघलक, मोगल व सुलतानशाही यांनी १६ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच मोठ्या भागावर राज्य केले . यादवांच्या अस्तानंतर समाज जागृत व एकसंघ ठेवण्याचे काम संतांनी केले .संतांचे कार्य, यादवांचा इतिहास व छत्रपती शिवरायांची प्रेरणा यातून मराठ्यांनी देशभर साम्राज्य उभे केले .
कितीही संकटे आली, प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असली तरी मोठी स्वप्ने पाहता येतात व ती सत्यात उतरवता येतात याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज .
महाराजांनी राज्य निर्मिती सोबत भाषा शुद्धीकरणाच्या चळवळीचे बहुमोल कार्य केले. त्यांनी राज्यव्यवहार कोश निर्माण केला
स्वराज्याच्या सीमे बद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवले आहे ‘ सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत म्हणजेच पेशावर पासून तंजावर पर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे हि तर श्रींची इच्छा ‘.
जेव्हा मराठे १७५७ ला अटकेपार पोहोचले तेथून रघुनाथरावाने पेशवे नानासाहेबांना पत्राद्वारे कळविले थोरल्या आबासाहेबांनी (छत्रपती शिवाजी महाराजांनी) दिलेले स्वप्न आपण पूर्ण करीत आणले आहे. पुढे आपण आदेश द्याल तर मराठी जरीपटका काबूल कंदाहार वर फडकवू.
पण त्याच वेळी इकडे प्लासीच्या लढाईत इंग्रजांची सरशी झाली होती तेव्हा तुम्ही परत या, कारण पेशव्यांसहित समस्त मराठ्यांना समजत होते की इंग्रजांपासून आपल्याला धोका आहे .
महाराष्ट्र नेहमी देशासाठी लढले, पानिपतचे युद्ध केवळ मराठे मराठी सत्तेसाठी नाही लढले दिल्लीची सत्ता पुन्हा परकीयांच्या ताब्यात जात होती ती वाचवण्या साठी लढले .
आज पानिपतच्या आठवणीने ही प्रत्येक मराठी मन सुन्न होते. अब्दाली ही कळून चुकला होता व युद्ध जिंकल्यावरही परत गेला .
१८१८ ला मराठी सत्तेच्या अस्तानंतर ही इंग्रजांना महाराष्ट्रात सुखासुखी राज्य करता आले नाही. शिवरायांचा वारसा पुढे महाराष्ट्राने सुरू ठेवला .कारण आपण पारतंत्र्यात का गेलो हा विचार तेवढ्याच वेगाने सुरू झाला .आत्मगत चिंतन सुरू झाले. शाळा सुरू झाल्या पाहिजे. इंग्रजी शिक्षण मिळाले पाहिजे. विषमता दूर केली पाहिजे. १८२१ मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण च्या माध्यमातून पहिले वृत्तपत्र सुरू केले. पेशव्यांच्या दरबारी असणारे गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांनी आपल्या दोषांचा अभ्यास करत शतपत्रे लिहिली. येथे स्वतःकडे कठोरपणे पाहण्याची मराठी माणसाची वृत्तीच अधोरेखित होताना दिसते .
१८५७ च्या उठावात भाग घेणारे मराठी सेनानी राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांचे स्वप्न एकच होते फिरंग्यांच्या तावडीतून देश मुक्त करू. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेच्या रूपात क्रांतिकारकांचे किंवा भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांच्या रूपात राजकीय सुधारणेचे किंवा फुले-शाहू-आंबेडकरांच्या रुपात समाज व धर्म सुधारणेचेही महाराष्ट्र केंद्रबिंदू ठरले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच वेळी चातुर्वर्ण व्यवस्थेशी लढा दिला, दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संविधान निर्मितीचे अभ्यासपूर्ण कार्य केले.
हिंदू राष्ट्रवादाचा विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे या विचारधारेचे एक तर दुसरे यावर्षी अत्यंत उत्साहात आपले शताब्दी वर्ष साजरे करत असलेले आर .एस .एस . चे प्रणेते डॉ. हेगडेवार मूळचे आंध्रचे असले तरी विचारांचे मुख्य केंद्र महाराष्ट्रातील नागपूर हे होते. भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य श्रीपाद अमृत डांगे महाराष्ट्रातील. टाटांच्या बरोबरीने लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी महाराष्ट्रात उद्योग सुरू केले. लुनिए ब्रदर्स ने पहिला चित्रपट केला तो दादासाहेब फाळकेंनी बघितला त्यातून त्यांनी पहिला मराठी चित्रपट बनविला तो पूर्णपणे भारतीय दृष्टिकोनातून व त्या चित्रपटाचे नाव होते ‘अयोध्येचा राजा ‘ म्हणून त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाते .
शेतीतील सहकार चळवळीचा जन्म महाराष्ट्रातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी प्रवरानगर येथून सहकारातुन उद्योग व्यवसाय विकसित केला .पुढे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, रत्नाप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे, काकासाहेब वाघ व नंतर देशभर चळवळ विकसित झाली .
शेतकरी संघटित करणे हे अशक्य वाटणारे काम शरद जोशींनी करून दाखविले. ‘शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे’ हा विषय घेऊन त्यांनी चळवळ उभी केली, त्याचा देशाच्या धोरणावर प्रभाव पडला, कृषी आयोग बनवावा लागला, शरद जोशी त्याचे अध्यक्ष झाले .
स्त्री मुक्ती चळवळ – महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यानी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे या सारख्या अनेक स्त्रियांनी शिकून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
महाराष्ट्रात साठोत्तरी साहित्यात दलित साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे या साहित्या संदर्भात म्हणतात, “मनुष्य, समाज, निसर्ग आणि नियती यांनी निर्माण केलेल्या नाना प्रकारच्या दुखांनी गदगदलेल्यांच्या व्यथा आणि वेदना प्रकाशात आणल्या”. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे, दया पवार, बाबुराव बागुल, केशव मेश्राम, माधव कोंडविलकर, नामदेव ढसाळ, शरणकुमार लिंबाळे, यांची नावे घेता येतील.
संगीत – हिंदुस्तानी क्लासिकल संगीताचा वैभवशाली कालखंड महाराष्ट्रा पासून सुरु होतो . दाक्षिणात्य म्हणजे कर्नाटकी संगीत व हिंदुस्तानी क्लासिकल म्हणजे उत्तर भारतीय संगीत या दोघांचा संयोग महाराष्ट्रात दिसतो म्हणूनच पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, किशोरी अमोनकर, परविन सुलतान, प्रभाताई अत्रे, कुमार गंधर्व असा वारसा महाराष्ट्रात निर्माण होण्यास मदत झाली. जगातील सर्वात मोठा शास्त्रीय संगीताचा महोत्सव सवाईगंधर्व महोत्सव पुण्यात होतो.
आदय नाटककार विष्णुदास भावे यांचा १८५३ साली सांगलीच्या राजवाड्यात ‘सीता स्वयंवर’ या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग झाला आणि मराठीतील नाट्य परंपरेचा जन्म झाला.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोन महाराष्ट्रातील भारत रत्नांनी आपापल्या कार्यक्षेत्रात केलेल्या देदीप्यमान कामगिरीने जग जिंकले.
पुण्यातील बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक संघटना बांधायला सुरुवात केली पुढे १९८६ मध्ये पंतप्रधान राजीव गांधींनी लक्ष घातले व ग्राहक संरक्षक कायदा अस्तित्वात आला .
इतरांनी केले त्याचे निरीक्षण करून त्यात नवी भर घालून नवे काम करणे हेच मराठी माणसाचे खरे वैशिष्ट्य आहे. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा व मराठी माणसाच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास मांडला आहे. शेवटी कवी श्रेष्ठ माधव ज्युलियन यांच्या याच ओळींचा आधार घेत म्हणावेसे वाटते.
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ||
प्रा. प्रशांत पुंडलिक शिरूडे ,
के. रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली
Email – prashantshirude1674@gmail.com
9967817876
