सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध साहित्यिक सौ. वृंदा कांबळी यांचा ‘अधुर्या कहाणीचा शेवट’ नावाचा कथासंग्रह बाजारात आला आहे. कणकवलीच्या विघ्नेश पुस्तक भांडारने हा कथासंग्रह प्रकाशित केला असून सौ कांबळी यांचे हे तेरावे पुस्तक तर सहावा कथासंग्रह आहे. यापूर्वी पाच कथासंग्रह पाच काद॔बर्या व दोन ललित अशी साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. काही पुस्तकांच्या तीन तीन आवृत्ती निघाल्या आहेत. त्यांच्या काही पुस्तकांना पुरस्कार देखील मिळाले आहेत.
‘ अधुर्या कहाणीचा शेवट ‘ या पुस्तकातील कथालेखनात सौ.कांबळी यानी नवीन प्रयोग केला आहे. अतिशय नाविन्यपूर्ण व वैविध्यपूर्ण मांडणी केली आहे. कांबळी यांच्या कथांमधून नेहमीच भोवतालच्या समाजाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. हा कथासंग्रह त्याला अपवाद नाही. सध्या स्मार्ट फोनसारखे अत्यंत प्रभावी साधन सामान्य माणसाच्या हाती येऊन सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन ढवळून निघत आहे. अनेक विचारांचे प्रवाह वाहत आहेत. अशावेळेस माणसे या माध्यमातून जवळ आल्यासारखी वाटतात. त्यात माणसांचे भावविश्व ढवळून निघते. मानवी मनाच्या आत असलेले भावभावनांचे सूक्ष्म पण प्रभावी रसायन लेखिकेने कथांमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी मनावर परिणाम करणारे भावनिक कंगोरे उलगडून दाखवले आहेत. माणसाच्या मनात रूतलेले एकाकीपण, त्यासाठी माणसानी शोधलेल्या वाटा, त्या वाटानी वाटचाल करण्यातील संघर्ष हे सर्व दाखवले आहे. यातील कथा या प्रेमकथा आहेत. तरी तारूण्यातील प्रेम व विरक्तीच्या उंबरठ्यावरील प्रेम यात फरक आहे. आताचे आकर्षण हे एका भावनिक गरजेतून निर्माण झालेले असते. मग ती एकाकीपणाची भावना असेल किंवा आधाराची गरज असेल. वृद्धापकाळात मनावर चढणारी नैराश्याची गूढ सावली पुसून टाकण्याचाही तो प्रयत्न असेल. ती अनामिक पण अदृष्य ओढ दोघेही कशी निभावतात , त्याचे परिणाम काय होतात हे कथांमधूनच वाचावे. कथांचा शेवट हा रंजक आहे. त्यामुळे या पुस्तकातील कथा या माणसाच्या मनाच्या अनेक पातळ्यांवरील भावनिक आंदोलने टिपतात. माणसाची अधुरी राहिलेली स्वप्ने, अपूर्ण राहिलेल्या आकांक्षा , त्यातील वेदना, त्यामुळे नात्यातील गुंतागुंत इत्यादी गोष्टी लेखिकेने कथांमधून प्रभावीरितीने मांडल्या आहेत. माणसाचे अधुरेपण आणि पूर्णत्वाकडे जाण्यासाठीची धडपड यातील संघर्ष दाखवला आहे. हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास कांबळी यानी व्यक्त केला आहे.
