कुडाळ:
साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स तर्फे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वृक्ष संवर्धन व जतन असा अनोखा उपक्रम राबवण्यात आला . कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या मुलांनी एक झाड लावून त्या झाडाला संरक्षणाच्या दृष्टीने राखी बांधून हे झाड जतन व संवर्धन करणार अशी शपथ घेतली. या शाळेतील जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश दिला. यावेळी वृक्षदिंडी काढून व संपूर्ण गावात जनजागृती करण्यात आली. यावेळी पर्यावरण व वृक्ष संवर्धन व आजच्या काळातील सामाजिक बदल या विषयी तरुण भारत संवादचे तालुका प्रतिनिधी तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड संतोष सावंत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. आपण सर्वांनी एकच प्रतिज्ञा करायला हवी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्ष संवर्धन व जतनासाठी ज्या उपायोजना केल्या, वृक्षतोड बंदी केली त्या शिवरायांचे विचार घेऊन आपण आजच्या तरुणांनी महाविद्यालयीन जीवनातच कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबर नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास करून प्रगल्भ व्हायला हवे आणि आजपासून आम्ही एकतरी वृक्ष संवर्धन व जतन करून नवीन ऊर्जा यातून निर्माण करू अशी प्रतिज्ञा करा. यातून जीवन निश्चितच सुखकारक आणि यशस्वी होईल असे ते म्हणाले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीणकुमार प्रभू केळुसकर यांनी कोकणात भरभरून नैसर्गिक संपत्ती आहे. परंतु या कोकणात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जय हिंद कॉलेजने असा संकल्प केला आहे या कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थी एक तरी झाड संवर्धन व जतन करून त्याची निगा राखेल यातून या विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा धडा देण्याचा आमचा मानस आहे. असे विविध उपक्रम या महाविद्यालयाच्या माध्यमातून घेतले जातील. विद्यार्थ्यांनी वृक्षाला आपला भाऊ मानून रक्षाबंधन निमित्ताने वृक्षाचे संवर्धन व जतन करण्याच्या घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. यावेळी बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ मयूर शार बिद्रे यांनी आज वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे . प्राणी मानवी वस्तीत येत आहेत याला आपणच जबाबदार आहोत. त्यामुळे त्यांचे खाद्य असणारे वृक्ष लागवड आपण करायला हवी असे ते म्हणाले. यावेळी उपस्थितांचे स्वागत प्राचार्य अमेय महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद धुरी तर आभार मनाली सावंत यांनी मानले.
