सावंतवाडी । प्रतिनिधी :
मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून याही वर्षी ग्रंथालयाच्या “रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात” मंगळवार, दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वा. ‘काव्यांजली’ स्वरचित कविता वाचन व गायन कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला निश्चितच एक वेगळी उंची प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कवी आणि साहित्यप्रेमींसाठी हा एक सुवर्णयोग असून त्यांना आपल्या स्वरचित कविता सादर करण्याची आणि अनुभवी कवींचे मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. या ‘काव्यांजली’ सोहळ्यात स्थानिक प्रतिभावंत कवींना आपले विचार आणि भावना काव्यात्मक रूपात मांडता येणार आहेत.
तसेच, कवितांचे गायन करून ते उपस्थितांना मंत्रमुग्ध करतील.
वाचनालयाने सर्व साहित्य रसिक, कवी आणि नागरिक यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि तो यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमामुळे मळगावच्या साहित्यविश्वात एक चैतन्याची लाट उसळेल आणि नवोदित कवींना प्रोत्साहन मिळेल अशी आशा आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली.

