*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आला श्रावण श्रावण*
मनमोही सर सांगत आली आला श्रावण आला
चैतन्याची लहर पसरली जीव प्रफुल्लित झाला ||
प्राजक्त कसा बहरुन आला सडा अंगणी पडतो
शुभ्र फुलांचा देठ केशरी रांगोळीसम दिसतो ||
इंद्रधनु नभी निसर्ग किमया मनोहर अशी घडते
आनंदाने मयुरपंख ते तालावरती झुलते ||
सणासुदीच्या पूजेस्तव ही फुले सुगंधी फुलली
दुर्वापत्री रांगोळ्यांनी आरास अशी सजली ||
भावभक्तिने श्रावण येता व्रतवैकल्ये घडती
कहाणीतुनी प्रबोधनाचे मार्ग अनोखे वदती ||
श्रावण म्हणजे नातीगोती मेळ प्रितीचा असतो
निसर्ग मानव नाते सुंदर बंध घट्ट तो करतो ||
श्रावणात या हिंदोळ्यावर मन माझेही झुलते
माहेराला मैत्रिणींसवे खेळ खेळुनी रमते ||
*ज्योत्स्ना तानवडे.पुणे*
