शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदर ते सागरी व मुंबई-गोवा महामार्ग जोडणीसाठी प्रयत्नशील – आमदार दीपक केसरकर
सावंतवाडी
सिंधुदुर्गातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदराशी तसेच सागरी व मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्याचे प्रयत्न सुरू असून, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मार्गामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही, याची खात्रीही त्यांनी दिली.
केसरकर म्हणाले की, “हा महामार्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे आहे. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये जमिनीची स्थिती वेगळी आहे, मात्र सिंधुदुर्गात असा प्रश्न उद्भवणार नाही.”
या वेळी शक्तिपीठ संघर्ष समितीच्या आंदोलनावर त्यांनी भाष्य टाळले. पत्रकार परिषदेस संजू परब, अशोक दळवी, प्रेमानंद देसाई, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
तसेच, मतदारसंघाच्या विकासासाठी पुढील काही दिवसांत आमदार केसरकर आठवड्यातून तीन दिवस तालुक्यांतील शासकीय कार्यालयात उपस्थित राहणार असून, थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
तिलारी परिसरात प्रस्तावित असलेला “अम्युझमेंट पार्क” हा रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी आवश्यक माहिती घेण्यासाठी लवकरच विदेश दौरा करण्याचाही त्यांनी उल्लेख केला. काजू-बोंडूपासून विविध पदार्थ तयार करण्याबाबत पेटंट घेण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
