गुरुवार दिनांक 27 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन संपन्न होत त्यानिमित्त मराठीतील एका संपन्न गझलकाराचा करून दिलेला हा परिचय.कवीश्रेष्ठ सुरेश भट यांचा इतका जवळचा संबंध येईल असे कधीच वाटले नाही .पण आमचे पितृतुल्य मित्र डॉ. श्री मोतीलालजी राठी प्रा.मधुकर केचे रामदास भाई श्राफ अरविंद ढवळे मीनाताई ढवळे दादा इंगळे वली सिद्धीकि डॉ.भाऊ मांडवकर या सर्वांमुळे मी सुरेश भटांच्या फार जवळ गेलो आणि शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिलो .मी तेव्हा अमरावतीच्या तपोवनमध्ये राहत होतो .दाजीसाहेब पटवर्धन व त्यांची कन्या श्रीमती अनुताई भागवत यांनी माझे सामाजिक कार्य लक्षात घेऊन मला माझ्या निवासस्थानी लागूनच असलेले एक पाच कक्ष असलेले पाच खोल्यांचे अतिथीगृह माझ्या हवाली केले होते. सुरेश भटांचे आमच्याकडे आगमन झाले म्हणजे ते त्या अतिथीगृहामध्ये थांबत होते .हे अतिथीगृह माझ्या घराला लागूनच असल्यामुळे सुरेश भट अनेक वेळा माझ्याकडे मुक्कामी असायचे . त्यांचे आदरतिथ्य करण्यामध्ये आम्हाला सर्वांनाच खूप आनंद व्हायचा.
खरं म्हणजे सुरेश भट यांना त्यांच्या मित्र परिवाराने खऱ्या अर्थाने साथ दिली. त्यांच्या पळतीच्या काळात अरविंद ढवळे डॉक्टर मोतीलाल राठी रामदास भाई वली सिद्दिकी दादा इंगळे ही सगळी मित्रमंडळी त्यांच्या मदतीला धावून आली. सुरेश भटांनी आपला पहिलाच कवितासंग्रह रामदास भाई श्राफ यांना अर्पण केला आहे. रामदास भाई श्राफ हे अमरावती गॅस एजन्सीचे मालक. ते श्रीकृष्ण पेठेत राहत होते. पण या सर्व मित्रांनी सुरेश भटांवर मनाभावे प्रेम केलेले आहे. ब्राह्मण परिवारात जन्मलेला हा कवी सतत बहुजनांमध्ये दलितांमध्ये आणि सामान्य माणसांमध्ये वावरत होता.
साधारणपणे आपल्या मुलाने शिकावे .पोटापाण्याला लागावे .हे कोणत्याही परिवाराची मापक अपेक्षा असते .पण सुरेश भट या सर्वांना अपवाद होते .नोकरी करणे हा त्यांचा पिंड नव्हता .पत्रकारिता आणि कार्यक्रम या बळावर हा माणूस आज महाराष्ट्राच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील मराठी माणसाच्या हृदयात आहे. सुरेश भटांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा मी साक्षीदार आहे. त्याला कारणही तसेच आहेत. मी प्राध्यापक असल्यामुळे मज जवळ त्या काळात भरपूर वेळ असायचा आणि मी ज्या संस्थेमध्ये काम करीत होतो त्या संस्थेचे अण्णासाहेब वैद्य बाळासाहेब कुलकर्णी बाबासाहेब सोमवंशी श्रीधर चिंचमलातरपुरे सुरेश भटांचेच मित्र त्यामुळे सुरेश भट यांचा फोन आला की मी नागपूरला निघून जायचा .त्यांच्याकडे थांबायचा .त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमाला जायचं .
.मला आठवते मुंबईला दादरला शिवाजी रंगमंदिरामध्ये हिंदु हदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरेश भटांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे यांचया बरोबर सुरेश भट साहेबांबरोबर मी स्टेजवर होतो.सुरेश भट यांना सदैव एक सहकारी लागायचा. त्यांना तंबाखू चुना काढून देणारा पाणी देणारा त्यांना मदत करणारा सहाय्यक म्हणून मी अनेक वर्ष उमेदवारी केली. माझी पत्नी विद्या तपोवनात अध्यापिका असल्यामुळे आणि तपोवन येथे सर्व सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे मला फिरायला रान मोकळे होते. त्यामुळे बाहेरगावी जायचे असले तर सुरेश भट यांचा पहिला फोन मलाच यायचा आणि मी सुरेश भटांना कधीही नकार द्यायचा नाही.
बेळगावला दैनिक तरुण भारतने सुरेश भटांचा रंग माझा वेगळा हा कार्यक्रम आयोजित केला होता. तरुण भारतचे संपादक श्री किरण ठाकूर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा मी तरुण होतो. मोठमोठ्या स्टेजवर सुरेश भटांबरोबर बसायला मिळत होते. मोठमोठ्या लोकांशी भेटीगाठी होत होत्या .अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून तर आशा भोसले लता मंगेशकर यांच्यापर्यंत. मला आठवते मुख्यमंत्री नागपूरला आले आणि त्यांना सुरेश भट दिसले तर ते सर्वप्रथम सुरेश भट यांनाच घेऊन आपल्या अँटी चेंबरमध्ये शिरायचे .मी त्यांच्याबरोबरच असायचा .
आशा भोसले सुरेश भटांचे एक गाणे एका चित्रपटासाठी गाणार होत्या .त्यासाठी एका हॉटेलमध्ये सुरेश भटांना त्यांनी बोलावले होते .सुरेश भटांबरोबर मी होतो. चित्रपट मराठी होता. गौतम राजाध्यक्ष हे सूत्रधार होते .साधारणत: त्या बैठकीला वीस पंचवीस लोक हजर होते .ते सर्व चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. चित्रपट मराठीमध्ये असला तरी सगळे बोलणे इंग्रजीमध्ये होते .कारण इतर तंत्रज्ञांना मराठी अवगत नव्हते. मला आठवते. दादरला शिवाजी रंगमंदिरामध्ये सुरेश भटांचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे हे स्वतः उपस्थित होते. कार्यक्रम सुरेश भट यांचाच होता .पण श्रीमती आशा भोसले यांचा त्या दिवशी मूड आला. आणि त्यांनी कार्यक्रमाच्या मध्यंतरात सुरेश भटांची स्टेजवर येऊन भेट घेतली आणि तुमची काही गीते मी आता म्हणते .याचा आग्रह धरला. अर्थातच सुरेश भटाने तो मान्य केला. आशाताईंनी सुरेश भटांची गाणी म्हणताच लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले.
मी सुरेश भट यांना घेऊन जेव्हा बेळगावला गेलो तेव्हा सुरेश भट आठवणीने मराठीतील सुप्रसिद्ध कवियत्री श्रीमती इंदिरा संत यांच्या भेटीला मला घेऊन गेले. तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री टी एस भाल हे सुरेश भटांचे अतिशय जवळचे मित्र .सुरेश भट अमरावतीला आले की डीएसपी बंगल्यावर मैफिली व्हायच्या. माझी जेव्हा सुरेश भट यांची ओळख झाली तेव्हा सुरेश भटांच्या मुक्काम हा अरविंद ढवळेंकडे जास्त असायचा. पुढे पुढे ते हनुमान व्यायाम शाळेत थांबायला लागले आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये ते माझ्याचकडे थांबायचे .ते यासाठी की माझ्याकडे असलेले अतिथिगृह आणि सोबतीला मी विद्या आमची मुलं पल्लवी प्राची शिवदास भालेराव शिवनयन ठाकरे रवी दांडगे हे मदतनीस म्हणून असायचे. सुरेश भट आमच्याकडे असले म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असायची .जाणारे येणारे चहा पाणी अल्पोपहार जेवण सतत सुरू असायचे.
सुरेश भटांचा दिवस रात्री सुरू व्हायचा आणि सकाळी सकाळी संपायचा .विद्याची नोकरी होती .पण तिने कधी कुरकुर केली नाही .त्या माणसाचे मोठेपण आम्हाला त्यांच्या जिवंतपणे कळले होते .प्रभाकरराव वैद्यांनी सुरेश भटांवर खऱ्या अर्थाने प्रेम केले. हनुमान व्यायाम शाळेचे दारे सदैव सुरेश भटांसाठी मोकळी असायची. हनुमान व्यायाम शाळेचे गेस्ट रूम गाडी सदैव सुरेश भटांच्या ताब्यात असायची. शिवाय सुरेश भटांना लागले सवरले ते सगळे उपलब्ध करून द्यायच्या सूचना त्यांनी त्यांच्या सेवेला ठेवलेल्या प्राध्यापकांना व कर्मचाऱ्यांना देऊन ठेवल्या होत्या.
सुरेश भटांचा एक भव्य दिव्य सत्कार अमरावतीच्या हनुमान व्यायाम शाळेमध्ये घ्यायचे ठरले होते. सुप्रसिद्ध गायिका श्रीमती आशा भोसले यांनी येण्याचे मान्य केले होते .15 एप्रिल या सुरेश भटांच्या वाढदिवसाला हा कार्यक्रम घ्यावा असा मानस होता .पण आशाताईंना काही अडचण आली आणि कार्यक्रम त्यांच्या सोयीने नंतर घेण्याचे ठरले. पण कार्यक्रम होण्याआधीच कवीश्रेष्ठ सुरेश भट आमच्यातून निघून गेले. आज सुरेश भटांकडे त्यांच्या कवितेकडे त्यांच्या अदाकारीकडे आम्ही जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा असे जाणवते अशी माणसे वारंवार होत नाहीत.असे कवी वारंवार होत नाहीत .आणि अशी माणुसकी जपणारी माणसे आता तर होने अशक्यच वाटते. आपल्या मित्राच्या पदोन्नतीसाठी सरळ मुख्यमंत्र्यांकडे जाणारा माझ्यासाठी विधान परिषदेच्या सभापतीकडे मला घेऊन जाणारा. शरद पवारांना या पोराला नोकरी द्या आणि नोकरी घेऊन देणारा हा माणूस खरोखरच मोठा होता .हा माणूस जिवंत असताना त्यांचे मूल्यांकन कदाचित कमी प्रमाणे झाले असेल .पण आज मात्र मराठी साहित्याच्या दालनात सुरेश भटांचा खऱ्या अर्थाने चांगला नावलौकिक
आहे आणि तो त्यांच्या काव्य लेखनाच्या खरेपणामुळे आहे .आकाशगंगा हे त्यांचे दीर्घ काव्य .पण ते पूर्ण कधी झालेच नाही. काही कविता सुरेश भटांनी माझ्यासमोर लिहिल्या .पण या माणसाने मनापासून लिहिले मनापासून व्यक्त केले आणि लोकांवर प्रेमही मनापासून केले .अशी माणसे आता निर्माण होणे कठीण वाटते.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प
9890967003