कॉपीमुक्त परीक्षांसाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना पालकमंत्र्यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यकमांतर्गत, शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली इ. १२ वी व इ. १० वीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी मत्स्य व बंदरे विभाग मंत्री तथा पालकमंत्री नितेश नारायण राणे यांनी खालीलप्रमाणे आवाहन केले आहे.
तुमच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून, ते तुमच्या ज्ञानवृध्दी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नामधून यश संपादन करा. विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करावी.
आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हयातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी कटीबध्द आहे. परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रीयेसाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकतेने आणि न्याय मार्गाने शिक्षणाला पुढे नेऊयात! असेही पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलेले आहे.

