You are currently viewing राखी पौर्णिमा

राखी पौर्णिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*

 

*राखी पौर्णिमा*

( *रक्षाबंधन*)

✡️🕉️✡️🕉️✡️

 

*युष्मतप्रसादात्सफला मम सन्तु मनोरथा :।*

*सर्वदा मतकुलेमाsस्तु भयं सप्रविषो उद्भवम।।*

 

*श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा समजले जाते. याला भारतीय संस्कृतीत अत्यन्त पवित्र मानलेल्या पवित्र नात्याचा म्हणजेच भावाबहिणीच्या अतूट प्रेमभावनेचा म्हणजेच रक्षा बंधनाचा सण मानला जातो.*

 

आपल्या अनेक प्राचीन भारतीय धर्मग्रंथातून अनेक धार्मिक कथा त्या कथांचे निरूपण झालेले आपल्याला आढळते. वैदिक काळापासून या रक्षाबंधन या भावनिक संस्कारांची श्रद्धा अबाधित आहे.

 

अत्यन्त महत्वाचे म्हणजे अगदी अनादिकालापासून आपल्या संस्कृतीप्रधान आणि संस्कारांचे नीतिमूल्ये जपणाऱ्या भारतात सर्व स्त्रिया आपल्या भगिनी असून त्यांचे रक्षण करणे ही नैतिक भावनां प्रत्येक पुरुषांच्या मनात असते तसेच सर्वच पुरुष आपले प्रिय बंधू आहेत ही भावनां मनात रुजवून परस्पर ही प्रेमभावना जगवीत जगणे आणि त्यासाठी एक प्रेमरेशीम धागा आपल्या भावच्या मनगटावर बांधणे ही प्रथा प्रचलित आहे.

 

अनेक पूर्वप्राचीन कथा मध्ये अनेक राज्यांच्या राज्यातील स्त्रियांनी स्वरक्षणाच्या श्रद्ध्येने राखी बांधल्याचे उल्लेख आहेत. आणि स्त्रियांचे रक्षण करण्याची नैतिक जबाबदारी ही सहृदयी समाजाची आहे हा विचार रुजला आहे.

*आपल्या भारतातील काश्मीरमध्ये या सणाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे.*

 

अमरनाथमध्ये या रक्षाबंधनाचे म्हणजेच राखीपौर्णिमेचे महत्व खुपच मानले जाते व तेथे अमरनाथाचे षोडशोपचारे पवित्र भावनेने पूजा करून दर्शन घेतले जाते. ही प्रथा आजही प्रचलित आहे.

पण आजकाल सर्वत्र सर्व जगतात हा रक्षाबंधनाचा ( राखीपौर्णिमेचा ) सण साजरा केला जातो.

 

” *यत्र नार्यस्तु पुज्यन्ते रमंते तत्र देवता:।*

*यत्रैनास्तु न पुज्यन्ते सर्वास्त्रत्राफल: क्रिया: ।।*

याचा अर्थ…..

 

*ज्या जगता मध्ये स्त्रीशक्तीचा सन्मान केला जातो , त्यांचे सर्वार्थाने रक्षण केले जाते. तेथे देवदेवतांचे वास्तव्य असते.*

*तेथे सर्वार्थाने समृद्धी असते*

 

*पण जेथे त्यांना दुर्लक्षित केले जाते, त्यांचे हरण केले जाते , त्यांचा* *अवमान , अपमान केला जातो तिथे स्त्रिया हतबल होतात , विकल, विफल होतात. तिथे* *अराजकता माजते आणि विध्वंस होतो . हा इतिहास आहे.*

 

परंतु या रक्षाबंधनाचा विधीसोहळा पार पडताना खालील मंत्राने राखी बांधण्याची संकल्पना रूढ आहे.

 

” *येन बद्धो बलीराजा दानवेंद्रो महाबला : ।।*

*तेन त्वां प्रतिवधनामि रक्षे माचल माचल ।।*

 

भारतीय सण उत्सवात प्रत्येक सणाला शास्त्रीय महत्व , शास्त्रीय परंपरा आहेत त्यामध्ये भौगोलिक , वैज्ञानीक , तसेच दिनमान , नक्षत्रे , तारतारका , ग्रहगोल आणि त्याचा मानवी प्रकृतीवर होणारा परिणाम आणि आरोग्य तसेच भावनां यांचा विचार केला आहे हे विचारांती जाणवते.

 

या सर्वच धार्मिक , सांस्कृतिक आनंद सोहळ्या बाबत वेदकालीन अनेक परंपरागत आख्यायिका आहेत त्या आपल्याला पुराणकथा किंवा प्रवचने कीर्तने अशा प्रबोनात्मक विषयातून ऐकायला मिळतात.

 

*त्याचे चिंतन , मनन तसेच सात्विक आचरण करुन श्रद्धेने अशा उत्सवांचा आनंद प्रत्येकानेच घेतला पाहिजे.*

 

” *संरक्षण करणे , राखण करणे , आधार देणे हा मूलभूत विचार राखी पौर्णिमा या भावनिक उत्सवातून मांडला आहे. आणि तेंव्हापासून या उत्सवाला धार्मिक परंपरा मानले जात आहे. श्रावण या अत्यन्त धार्मीक महिना मानले असून या श्रावणी पौर्णिमेला श्रावण नक्षत्र असेल तर तो दिवस अत्यन्त लाभदायक आणि उत्तम कार्यासाठी खूप अनुकूल आहे असे समजले आहे .*

 

*उत्तरभारतात ” कजरी पौर्णिमा तर महाराष्ट्रात राखी पौर्णिमा, पश्चिम भारतात नारळी पौर्णिमा तसेच रक्षाबंधन या नावाने हा सण आज भारतातच नव्हे तर सर्व जगतात साजरा केला जातो.*

 

*आपल्याकडे कोकणात हा उत्सव आपले सर्व कोळी बांधव समुद्राला भगवंत मानून अत्यन्त श्रद्धेने समुद्राला सुवर्ण अर्पण करून त्याची साग्रसंगीत पुजा करतात.*

 

*संरक्षण करणे ही एकमेव वैचारिक भावना मनामध्ये रुजवून बहीण आपल्या भावाला एक निर्मळ प्रेमभावना रेशमी धाग्याने आपल्या भावाच्या मनगटावर बांधून भावाकडून रक्षणाचे वचन घेत असते आणि भाऊ देखील असे वचन देवून आपल्या बहिणीचे रक्षण करतो ही पवित्र भावना हाच या रक्षाबंधचा भावनिक प्रेमळ असा गर्भितार्थ आहे.*

तेंव्हा या अशा श्रावण महिन्यात येणाऱ्या उत्सवांचे वैशिष्ट्य म्हणजे या कालावधीत प्रत्यक्ष भगवंताचे वास्तव्य पृथ्वीतलावर आहे असे समजून आपल्या मनाला मनःशांती देणाऱ्या व्रत वैकल्याचे शास्त्रोक्त विधिवत पूजा , पठण , भक्तिभावाने , श्रद्धेने करणे हे अत्यन्त महत्वाचे आहे. आणि या कालावधीत सर्व निसर्ग , सर्व ऋतू देखील प्रसन्नतेने उमलत आहेत याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. हीच खरी आनंदी श्रावणी असते.. !!!

✡️🕉️✡️🕉️✡️🕉️✡️🕉️✡️

 

*इती लेखन सीमा…..*

*वि.ग.सातपुते.*

*©️अध्यक्ष ,*

*महाकवी कालिदास प्रतिष्ठान*

*पुणे , मुंबई , ठाणे , मराठवाडा ( महाराष्ट )*

*📞 ( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा