You are currently viewing रत्नसिंधू योजनेचा धनदांडग्यांसाठी वापर; मायनींगसाठी दिला ६० लाखाचा निधी

रत्नसिंधू योजनेचा धनदांडग्यांसाठी वापर; मायनींगसाठी दिला ६० लाखाचा निधी

*जिल्हाधिकारी यांचे मायनिंग व्यवसायिकाशी साटेलोटे असल्याचा आमदार वैभव नाईक यांचा आरोप*

 

कुडाळ :

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी रत्नसिंधु योजना सुरु केली आहे. पर्यावरणक्षम शाश्वत विकास घडविणे,कृषि, फलोत्पादन व संलग्न सेवा, पशुधन विकास व दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, पर्यटन विकास या क्षेत्रावर भर देत रोजगार निर्मिती आणि दरडोई उत्पन्नात वाढ करणे या उद्देशाने हि योजना बनवण्यात आली होती. मात्र या रत्नसिंधू योजनेतुन तिवरे गावात चालू असलेल्या ज्ञानलक्ष्मी मिनरल्स अँड मायनींगच्या सिलिका वाळू कारखान्यास लागणाऱ्या ११ केव्ही (११०० वोल्टेज)च्या हाय वोल्टेज लाईनसाठी ६० लाख रु. निधी देण्यात आला आहे. या कामाला तिवरे गावातील शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील बळजबरीने वीज खांब पुरले जात आहेत. जिल्हाधिकारी यांचे त्या मायनिंग व्यवसायिकाशी साटेलोटे असल्यानेच सिलिका वाळू सारख्या पर्यावरणास घातक असणाऱ्या प्रकल्पाला शासनाचा निधी देऊन त्याचा दुरुपयोग केला जात आहे. जिल्ह्यात वीज संबंधित नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. अनेक ठिकाणी ट्रान्सफार्मर,नागरिकांच्या शेतात आणि घराजवळ असणारे विद्युत पोल बदलणे, लाईन शिफ्टिंग करणे अशी अनेक कामे निधी अभावी प्रलंबीत असताना या कामांना निधी देण्याऐवजी रत्नसिंधू योजनेचा निधी धनदांडग्यांना दिला जात आहे. हि योजना शेतकऱ्यांसाठी आहे कि मायनींग वाल्यांसाठी? असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा